पुणे : तूरडाळ प्रकरणात गिरीश बापट यांनी कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर मागे घेतला आहे.
बापट यांनी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. एम. ए. सय्यद यांच्या न्यायालयात मलिक यांच्याविरुद्ध अब्रू नुकसान भरपाईचा दावा दाखल केला होता. मलिक यांनी लेखी निवेदन देऊन बापट यांच्यावरील आरोप मागे घेत आहोत असे स्पष्ट केल्याने बापट यांनी हा दावा मागे घेतला. मलिक यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन बापट यांनी तूरडाळ प्रकरणात भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला होता. त्यांनी तूरडाळीचे निर्बंध शिथिल करून डाळ विकण्यास परवानगी दिली व दोन हजार कोटी रुपयांचा घोटाळा केला म्हणून बापट यांना मंत्रीपदावरून काढून टाकावे, अशी मागणी केली होती.
या आरोपांना बापट यांनी न्यायालयात आव्हान दिले. जी डाळ जप्त करण्यात आली ती ५४० कोटी रुपयांची होती त्यामध्ये फक्त १४० कोटी रुपयांची तूरडाळ होती व मुक्त करण्यात आलेल्या डाळींची किंमत ४३ कोटी रुपयांची होती. त्यामुळे याप्रकरणात भ्रष्टाचार झाला नाही असा दावा बापट यांनी केला. मलिक हे स्वत: मंत्री होते, त्यांच्यावरही अनेक आरोप झाले होते. याकडे बापट यांनी न्यायालयाचे लक्ष वेधले. मलिक यांनी बापट यांच्यावर कोणतेही वैयक्तिक आरोप करायचे नाहीत, असे न्यायालयात लिहून दिले. या व्यवहारात बापट यांच्याकडून कोणताही भ्रष्टाचार झाला नाही, असेही त्यांनी न्या. सय्यद यांच्यासमोर नमूद केले. यावर न्यायालयाने दोन्ही बाजूंचा विचार करून तडजोडीचा मसुदा द्यावा अशी सूचना केली. ती उभयपक्षी मान्य करण्यात आली व आज हा दावा तडजोडीने मागे घेण्यात आला. या खटल्यात बापट यांच्या वतीने अॅड. एस. के. जैन यांनी काम पहिले.
या संदर्भात बोलताना बापट म्हणाले, ‘लोकायुक्तांसह आता न्यायालयानेही मला क्लिन चीट दिली आहे. मी व्यक्तिगत जीवनात कोणतेही आरोप सहन करत नाही. म्हणूनच मी अब्रू नुकसानीचा दावा दाखल केला. प्रत्यक्षात आम्ही ५१ कोटी रुपयांच्या डाळींचे वाटप केले. त्यावर आठ हजार कोटी, कोणी १० हजार कोटींचा भ्रष्टाचाराचा आरोप आमच्यावर केला. त्यातून मी आता निर्दोष मुक्त झालो आहे. सरकारी धोरणांवर आरोप करायला माझी काहीच हरकत नाही मी त्यांचे स्वागत करेन.’